गोंडपिपरी,
Tiger attack धाबा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गोंडपिपरी उपवनक्षेत्रातील चेकपिपरी शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. ही घटना रविवार, 19 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. भाऊजी पत्रू पाल (55, रा. चेकपिपरी) असे मृतक शेतकर्याचे नाव आहे.
मध्यचांदा वनविभाग अंतर्गत येणार्या गोंडपिपरी तालुक्यात कन्हाळगाव अभयारण्य असून, यात हरीण, चितळ, सांबर यासह वाघ, बिबट, अस्वल आदी हिंस्त्र पशू आहेत. काही दिवसांपूर्वी विहीरगाव, गणेशपिपरी, कोरंबी परिसरात वाघाचा वावर असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. परिसरातील शेतकरी यासह नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनदेखील वनपरिक्षेत्राधिकारी किशोर गौरकार यांनी केले होते.
पण चेकपिपरी येथील शेतकरी पाल शनिवारी सकाळी शेतात पीक पाहणीकरिता गेले होते. मात्र सायंकाळी होऊनही ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबियांना शेत शिवारात शोध घेतला असता कापूस लागवड केलेल्या शेतात त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. वाघाने हल्ला करून ठार केल्याचे निदर्शनास येताच गावकर्यांनी घटनेची माहिती पोलिस विभाग आणि वनकर्मचारी यांना दिली. पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तिगोटे व वन विभाग करीत आहेत.