भातकुली तालुक्यात घोषणा
भातकुली,
Valmiki Monastery in Pandharpur भातकुलीजवळच असलेल्या खालकोनी या गावातून तीर्थक्षेत्र पंढरपुरात वाल्मीकी मठ उभारण्याची संकल्पना करण्यात आली. राज्यातील वारकरी संप्रदायातूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. खालकोनी येथे झालेल्या हनुमान जयंती महोत्सवात कीर्तनाच्या व्यासपीठावरून हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. हजारो भाविकांच्या साक्षीने जाहीर झालेल्या या संकल्पामुळे राज्यभरातील वारकरी बांधवांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.
वारकरी भूषण रवींद्र महाराज पाटील खालकोनीकर यांनी आपल्या आक्रमक व प्रभावी कीर्तनातून पंढरीची वारी हीच खरी जीवनशुद्धी असा संदेश देत भाविकांना थेट साद घातली. वर्षातून एकदा वारी नाही, तर जीवन अपूर्णच, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी पायी वारीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी जाहीर करण्यात आले की, महर्षी वाल्मीकी पायी दिंडी सोहळा १९ जून २०२६ रोजी खालकोनी, सामदा काशीपूर येथून आरंभ होणार असून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. १८ जुलै रोजी पंढरपुरात आगमन होऊन १९ जुलैपासून दिंडी संचालक रवींद्र महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भागवत कथेचा प्रारंभ होईल. २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त गोपाळपूर प्रदक्षिणेनंतर दिंडीची सांगता करण्यात येणार आहे.
Valmiki Monastery in Pandharpur दरम्यान, पंढरपुरात वाल्मिकी मठ उभारण्यासाठी ६५ एकंराच्या पश्चिमेस चंद्रभागेच्या तीरी १५ गुंठे जागा खरेदीचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, यासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी उभारण्याचा निर्धार व्यक्तकरण्यात आला. आता मागे हटायचे नाही, मठ उभारायचाच! असा निर्धार व्यक्त करत भाविकांनी या धार्मिक चळवळीला राज्यव्यापी स्वरूप देण्याचा इशारा दिला. खालकोनी येथील हा संकल्प आता केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता राज्यभरातील वारकरी बांधवांना एकत्र आणणारा ठरत आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.